खालील कवितेचे नाव मला खर तर माहित नाहीये पण मला असे वाटले कि ह्या कवितेचे नाव 'मी' असू शकते. शिवाय हि कोणत्या काव्यसंग्रहातील कविता आहे ह्याची नोंद माझ्याकडे नाहीये... कोणाला जर ह्या कवितेचे खरे नाव व काव्यसंग्रहाचे नाव माहिती असेल तर मला जरूर कळवावे म्हणजे मी ते नोंद करू शकेन...
मी केव्हा गर्दीतून जीवाला सांभाळत जाणारी
मी केव्हा गर्दीतही आत्यंतिक एकाकी होणारी
मी बघते आत्मतुष्ट लोक किती भवताली वावरती
चुकताही धूर्तपणे आपलेच आपणास सावरती
वावदूक विद्वता, शब्दांची हुन्नर वा चतुराई
मजपाशी यामधले काहीही काहीही मुळी नाही
मी-तू चा तू-मी चा घोष असा अव्याहत कानावर
वरवरची बेहोशी आतून हे छान परी भानावर
मुखवट्यात वरच्या या मुखवटेच आत पुन्हा दडलेले
झडलेले पीस पीस... सत्य इथे मरगळून पडलेले
या लाटा कोसळती फेकुनिया देती मज दूर दूर
वाळूवर मी, आणिक घोंघावत शेजारी उग्र धूर
मी मजला न्याहाळीते, माझ्यातून अलग अशी होते मी.
निष्कलंक शुभ्र फुले देहावर ओढुनिया घेते मी.
दुःख - शांता शेळके ( गोंदण ह्या काव्यसंग्रहातून)
दुःख समंजस माझे
नाही फिरवली द्वाही
कधी आले आणि गेले
मला कळलेही नाही!
मला कळले हि नाही
उरे पुसटशी खुण
... फक्त फिकट चांदणे
... फक्त मंदावते उन
रविवार, १५ ऑगस्ट, २०१०
मी - शांता शेळके
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
८/१५/२०१० ०९:१६:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०
'कसे' आणि 'मन माझे' - निवेदिता पटवर्धन
आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी संघ होता. त्याच्यातर्फे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवायचो. त्यातच काही सामाजिक कामेहि करायचो... आमच्या आसपासच्या लोकांकडून जुने कपडे, पुस्तके गोळा करायचो... डॉक्टरांकडून free samples गोळा करायचो आणि ते सर्व येऊरला म्हणजे ठाण्याजवळच्या गावात जाऊन तिथल्या लोकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना नेऊन द्यायचो... त्या निमित्ताने आपल्या घराच्या सुरक्षित आणि सुखसोयींपलीकडे खरं जग किती कठीण असू शकतं हे कळलं.... college मध्ये समाजवाद शिकत होतो... शिवाय ते दिवस हि खूप उमेदीचे, आशावादाचे, काही तरी करण्याच्या उत्साहाचे होते... खालील दोन कविता ह्या माझ्या त्या दिवसातल्या मानसिक विश्वाची झलक दाखवतात... आता खर तर वाचूनहि पहिल्यांदा उदास वाटलं कि अरे ह्यातलं काहीच करायला जमलं नाही... पण नंतर परत मनाला समजावलं... अजून बरंच काही आपल्या हाती आहे... अजूनही वेळ गेलेली नाही... मग परत जरा मनाला उभारी आली....
पहिल्या कवितेत सैरभैर झालेल्या व बाहेरच्या विश्वातले प्रखर सत्य पाहून भांबावलेल्या माझ्या मनाला पडलेले प्रश्न आहेत. तर दुसऱ्या कवितेत माझी द्विधा दिसते.. एकीकडे तर तरुणपणातली एक सहज आणि स्वाभाविक स्वप्नचित्र खुणावत होती तर दुसरीकडे चाकोरीतल्या जीवनापलीकडे जाऊन काहीतरी करण्याची तडप होती...
पहिल्या कवितेत सैरभैर झालेल्या व बाहेरच्या विश्वातले प्रखर सत्य पाहून भांबावलेल्या माझ्या मनाला पडलेले प्रश्न आहेत. तर दुसऱ्या कवितेत माझी द्विधा दिसते.. एकीकडे तर तरुणपणातली एक सहज आणि स्वाभाविक स्वप्नचित्र खुणावत होती तर दुसरीकडे चाकोरीतल्या जीवनापलीकडे जाऊन काहीतरी करण्याची तडप होती...
कसे -
सुखाशिवाय दुःख लोक झेलतात तरी कसे?
दुःखभरल्या या जगात लोक सुखावतात तरी कसे?
सत्यापासून दूर लोक स्वप्नात रमतात तरी कसे?
अशाश्वताच्या सत्यास लोक विसरतात तरी कसे?
प्रेमापासून दूर लोक भांडतात तरी कसे?
मायेशिवाय बाल्य इथे फुलतेच तरी कसे?
निराधारांना आधार इथे मिळणार तरी कसे?
स्वतःपुरता विचार सोडायला लोक शिकणार तरी कसे?
वर्तमानात अंधकार लोक जगतात तरी कसे?
भविष्यही नाही साकार, लोक निष्काळजी कसे?
मन माझे निराधार, कळेना आधार लोकांचे कसे?
शोधे शांती निराकार, शक्य करावे हे कसे?
सारेच कसे मी उमजणार तर कसे?
समजून उमजून हि वळते कधी न कसे?
नाही! मला मात्र नाही हे असे जगायचे...
पण...
पण कुणास ठाऊक मलाही जगावे लागणार आहे कसे?
मन माझे
मन माझे वेडे सदा अशांतीतच रमे
खुणावेल जो कोणी त्या मागे पळते
कधी रमते रम्य स्वप्नचीत्रात
राजा आणि राणी नाही कशाची ददात
सुखामागे पळे बापुडे दुःखालाही स्वीकारत
मन माझे वेडे, शोधे अर्थ सगळ्यात
कधी होई कासावीस, वाटे निराधार
सगळेच होई निरर्थक आणि निराकार
सुखाची नसे चिंता होई दुःखावर स्वर
मन माझे वेडे, नाही दुःखही साकार
कधी रमते भविष्याच्या सुखस्वप्नात
ग्रासते कधी वर्तमानाच्या विवंचनात
भांबावते भूतकाळाच्या आठवणीत केव्हा
मन माझे वेडे, न जाणो स्थिरावेल केव्हा
लोक जगतात तरी का आणि कसे
मी तरी जगते कशी आणि का
उत्तरे मिळूनही अनुत्तरीतच हे कोडे
मन माझे वेडे, शोधे कोठे उत्तर का सापडे....
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
८/०८/२०१० १०:५५:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)