रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

बा. भ. बोरकर

क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं !
लाजण झाली धरती गं
साजण काठावरती गं
उन्हात पान
मनात गान
ओलावून थरथरते गं !
नाते अपुले न्हाते गं
होऊन ऋतूरस गाते गं
तृणात मोती
जळात ज्योती
लावीत आले परते गं !

बा. भ. बोरकर (चित्रवीणा ह्या काव्यसंग्रहातून)

हिरवळ आणिक पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी
निळीतून पांखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी ||
सुखांत चरती गुरेवासरे
लवेतूनी लहरते कापरे
हवेतुनी आरोग्य खेळते गार नि आरसपानी ||
उरी जिथे भूमीची माया
उन्हात घाली हिरवी छाया
सांडीत कोमल आनंदाचे पाझर पानोपानी ||
जिथे अशी समृद्ध धरित्री
घुमती घरे आणि पुत्रकलत्री
रमे श्रमश्री माहेरींच्या स्वाभाविक लावण्यी ||
सख्यापरते जिथे न बंधन
स्मितांत शरदांचे आमंत्रण
सहजोद्वारी गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी ||
ऋतूऋतुंतून जिथे सोहळे
तसेच उघड्यावरी मोकळे
आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी ||
माणूस जेथे हवाहवासा
अभंग-ओवीमध्ये दिलासा
विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी ||
देव जिथे हृदयात सदाचा
भार मनाला नसे उद्यांचा
सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी ||

रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

सांगता - अनु आमलेकर

काही का घडेना, घडते तर आहे
घडणे जेव्हा थांबेल, तेव्हा सर्व संपलेले असेल
अज्ञानाच्या ढिगाऱ्यात मीच मला शोधते आहे
हा शोध तेव्हाच सरेल, जेव्हा सर्व संपलेले असेल,
माझ्या अस्तित्वाचे काही प्रयोजन असेल
विध्यात्याचा त्यात काही हेतूही असेल
पण जेव्हा हे कारणच नसेल, तेव्हा सर्व संपलेले असेल,
रासायनिक प्रक्रिया किंवा विधीचे नाटक असेल
प्रयोग एकदा उरकला कि सर्व संपलेले असेल
धरती दुभंगेल, महाप्रलयहि कदाचित होतील
माझ्याकरता मात्र आधीच, हे सर्व संपलेले असेल
कुणी हळू कुजबुजतील, कुणी मुक्त हसतील
क्वचित कुणी विचारही करतील, जेव्हा सर्व संपलेले असेल
मनाला सारखा प्रश्न पडतो, तुम्हालाही पडत असेल
खरंच का शेवटी असे सगळे सगळे संपत असेल?
गेल्यानंतर यावे लागेल? पुन्हा चक्र सुरु होईल?
कि परत कधीच यायचे नाही? सर्व काही संपले असेल
जागून उत्तर शोधताना, कधी अचानक वाटते
सीमेपलीकडील कुणी भेटेल
दिलखुलासपणे हसत म्हणेल, खुशाल झोपी जा तू
हे खरंच सर्व संपलेले असेल!

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

मी - शांता शेळके

खालील कवितेचे नाव मला खर तर माहित नाहीये पण मला असे वाटले कि ह्या कवितेचे नाव 'मी' असू शकते. शिवाय हि कोणत्या काव्यसंग्रहातील कविता आहे ह्याची नोंद माझ्याकडे नाहीये... कोणाला जर ह्या कवितेचे खरे नाव व काव्यसंग्रहाचे नाव माहिती असेल तर मला जरूर कळवावे म्हणजे मी ते नोंद करू शकेन...

मी केव्हा गर्दीतून जीवाला सांभाळत जाणारी
मी केव्हा गर्दीतही आत्यंतिक एकाकी होणारी
मी बघते आत्मतुष्ट लोक किती भवताली वावरती
चुकताही धूर्तपणे आपलेच आपणास सावरती

वावदूक विद्वता, शब्दांची हुन्नर वा चतुराई
मजपाशी यामधले काहीही काहीही मुळी नाही
मी-तू चा तू-मी चा घोष असा अव्याहत कानावर
वरवरची बेहोशी आतून हे छान परी भानावर

मुखवट्यात वरच्या या मुखवटेच आत पुन्हा दडलेले
झडलेले पीस पीस... सत्य इथे मरगळून पडलेले
या लाटा कोसळती फेकुनिया देती मज दूर दूर
वाळूवर मी, आणिक घोंघावत शेजारी उग्र धूर

मी मजला न्याहाळीते, माझ्यातून अलग अशी होते मी.
निष्कलंक शुभ्र फुले देहावर ओढुनिया घेते मी.


दुःख - शांता शेळके ( गोंदण ह्या काव्यसंग्रहातून)

दुःख समंजस माझे
नाही फिरवली द्वाही
कधी आले आणि गेले
मला कळलेही नाही!

मला कळले हि नाही
उरे पुसटशी खुण
... फक्त फिकट चांदणे
... फक्त मंदावते उन

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

'कसे' आणि 'मन माझे' - निवेदिता पटवर्धन

आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी संघ होता. त्याच्यातर्फे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवायचो. त्यातच काही सामाजिक कामेहि करायचो... आमच्या आसपासच्या लोकांकडून जुने कपडे, पुस्तके गोळा करायचो... डॉक्टरांकडून free samples गोळा करायचो आणि ते सर्व येऊरला म्हणजे ठाण्याजवळच्या गावात जाऊन तिथल्या लोकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना नेऊन द्यायचो... त्या निमित्ताने आपल्या घराच्या सुरक्षित आणि सुखसोयींपलीकडे खरं जग किती कठीण असू शकतं हे कळलं.... college मध्ये समाजवाद शिकत होतो... शिवाय ते दिवस हि खूप उमेदीचे, आशावादाचे, काही तरी करण्याच्या उत्साहाचे होते... खालील दोन कविता ह्या माझ्या त्या दिवसातल्या मानसिक विश्वाची झलक दाखवतात... आता खर तर वाचूनहि पहिल्यांदा उदास वाटलं कि अरे ह्यातलं काहीच करायला जमलं नाही... पण नंतर परत मनाला समजावलं... अजून बरंच काही आपल्या हाती आहे... अजूनही वेळ गेलेली नाही... मग परत जरा मनाला उभारी आली....

पहिल्या कवितेत सैरभैर झालेल्या व बाहेरच्या विश्वातले प्रखर सत्य पाहून भांबावलेल्या माझ्या मनाला पडलेले प्रश्न आहेत. तर दुसऱ्या कवितेत माझी द्विधा दिसते.. एकीकडे तर तरुणपणातली एक सहज आणि स्वाभाविक स्वप्नचित्र खुणावत होती तर दुसरीकडे चाकोरीतल्या जीवनापलीकडे जाऊन काहीतरी करण्याची तडप होती...

कसे -

सुखाशिवाय दुःख लोक झेलतात तरी कसे?
दुःखभरल्या या जगात लोक सुखावतात तरी कसे?
सत्यापासून दूर लोक स्वप्नात रमतात तरी कसे?
अशाश्वताच्या सत्यास लोक विसरतात तरी कसे?

प्रेमापासून दूर लोक भांडतात तरी कसे?
मायेशिवाय बाल्य इथे फुलतेच तरी कसे?
निराधारांना आधार इथे मिळणार तरी कसे?
स्वतःपुरता विचार सोडायला लोक शिकणार तरी कसे?

वर्तमानात अंधकार लोक जगतात तरी कसे?
भविष्यही नाही साकार, लोक निष्काळजी कसे?
मन माझे निराधार, कळेना आधार लोकांचे कसे?
शोधे शांती निराकार, शक्य करावे हे कसे?

सारेच कसे मी उमजणार तर कसे?
समजून उमजून हि वळते कधी न कसे?
नाही! मला मात्र नाही हे असे जगायचे...
पण...
पण कुणास ठाऊक मलाही जगावे लागणार आहे कसे?





मन माझे


मन माझे वेडे सदा अशांतीतच रमे
खुणावेल जो कोणी त्या मागे पळते

कधी रमते रम्य स्वप्नचीत्रात
राजा आणि राणी नाही कशाची ददात
सुखामागे पळे बापुडे दुःखालाही स्वीकारत
मन माझे वेडे, शोधे अर्थ सगळ्यात

कधी होई कासावीस, वाटे निराधार
सगळेच होई निरर्थक आणि निराकार
सुखाची नसे चिंता होई दुःखावर स्वर
मन माझे वेडे, नाही दुःखही साकार

कधी रमते भविष्याच्या सुखस्वप्नात
ग्रासते कधी वर्तमानाच्या विवंचनात
भांबावते भूतकाळाच्या आठवणीत केव्हा
मन माझे वेडे, न जाणो स्थिरावेल केव्हा

लोक जगतात तरी का आणि कसे
मी तरी जगते कशी आणि का
उत्तरे मिळूनही अनुत्तरीतच हे कोडे
मन माझे वेडे, शोधे कोठे उत्तर का सापडे....

शनिवार, ३१ जुलै, २०१०

चाहूल - समीर करंदीकर ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

तुझ्या थोडयाश्या हास्यात
तुझा आनंद मावेना
त्याची चाहूल लागली
तुझा श्वासही ठरेना

आता येणार सानुल्या
जाईजुईला बहर
स्वप्नं पुनवेच पडे
उगवली चंद्रकोर

भासे शब्दांत काळजी
मिटे पापणी उत्सुक
गर्भ-रेशमी पदरी
नव्या पालवीचे सुख

एका छोट्या स्पंदनाने
सारा आनंद गावला
तुझ्या-माझ्या जगण्याला
आता.... नवा अर्थ आला

नातं - शिल्पा केळकर ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

तशी तिची-माझी ओळख जन्मांतरीची
तिचा निर्व्याज-निष्पाप चेहराही माझा
तिचा खट्याळ-खोडकरपणा आणि
तिच्या बुद्धीमत्वाची चमकही जणू
माझ्याच मालकीची...
आता मात्र तिची मला ओळख पटते आहे
आणि तिच्या नजरेत परकेपणाही जाणवतो आहे,
माझ्यापासून वेगळे होऊ पाहणारे
माझेच 'अस्तित्व'
जणू काही माझी मलाच
नव्याने ओळख करून देते आहे!

निरोप - योगेश फडणीस ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

अर्धवट बहर अबोलीचा
अर्ध्यात थांबला झोका
चिंब पावसात एकत्र भिजूनही
तू कसा राहिलास कोरडा.....

मळवट भरला उगवतीचा
वाटेतच थांबला पहाटवारा
एकत्र स्वप्नं रंगवताना
तू कसा मिटलास डोळा....

रिकाम्या ओंजळीचा हात आपला
कंदिलाच्या प्रकाशाने उजळला
दारासमोरच्या सुंदर रांगोळीत
राखेचा रंग का भरलास...

आता प्रवास उरला एकटीचा
पण त्यालाही नसे काही दिशा
मध्यान्हीची उन्हंही उतरली
सावलीसारखा तू रे का दुरावला....

शनिवार, २४ जुलै, २०१०

राधा - सुजाता भिडे ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

रागावणार होती ती त्या काळ्या नभावर
अवेळीच बरसल्याबद्दल
पण तेवढ्यात सुगंध पसरला मातीचा,
अन त्या नभावरच मन जडलं तिचं!

रुसणार होती ती त्या रिमझिम धारांवर
तीन्हीसंजेचा सोनेरीपणा घालवल्याबद्दल -
पण तेवढ्यात फुलून आलं इंद्रधनुष्य,
अन त्या धारांवरच प्रेम बसलं तिचं!

ती नाराजच होती त्या सांजवेळेवर
उगीचच हुरहूर लावल्याबद्दल -
पण तेवढ्यात बासरी घुमली आसमंतात,
अन सोनं झालं तिच्या संध्याकाळीच!!

आशा - सुजाता भिडे ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

त्या अक्राळविक्राळ वृक्षांच्या
अभेद्य तटबंदीमध्ये -
तो काळाशार डोह एकटाच पसरला होता,
म्लान, श्रांत, एकाकी...
सूर्योदय होऊ घातला होता का?
कि आता रात्रीची सुरवात?

डोह वाट पाहत होता - वर्षानुवर्ष
एखादी चाहूल,
एखादी पक्ष्याची लकेर,
निदान एखादा तरंग - त्याचं अंग मोहरून टाकणारा...
पण काळ जणू थांबून गेला होता.
त्या विचारांनी डोह आणखीच काळवंडला,
निराश झाला!
पुन्हा एकदा आक्रसून जाताना
अचानक त्याच्या नजरेत आलं
ते इवलंसं रोपटं -

कशालाही न जुमानता, उन्हाचा एक धीट कवडसा
त्या वृक्षांना भेदून खाली आलं होता,
त्या रोपट्याला कवटाळू पाहत होता -
आणि रोपटं दिमाखात डोलत होतं
वृक्षांच्या नजरेला नजर देत

डोह सुखावला...
ती काळरात्र नव्हती,
सूर्य अजून जागा होता!!!

शनिवार, १७ जुलै, २०१०

सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून

ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर
पाय दवाचे... ओले...


मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....


न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...


मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!



वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा...
नादला एकदा आषाढाचा 'झाला'
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला


शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता...


तू वेध घेतला
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?


आकाश तरंगे
उंचावरती दूर
मातीच्या हृदयी
झुरणीचे काहूर
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू