पहिल्या कवितेत सैरभैर झालेल्या व बाहेरच्या विश्वातले प्रखर सत्य पाहून भांबावलेल्या माझ्या मनाला पडलेले प्रश्न आहेत. तर दुसऱ्या कवितेत माझी द्विधा दिसते.. एकीकडे तर तरुणपणातली एक सहज आणि स्वाभाविक स्वप्नचित्र खुणावत होती तर दुसरीकडे चाकोरीतल्या जीवनापलीकडे जाऊन काहीतरी करण्याची तडप होती...
कसे -
सुखाशिवाय दुःख लोक झेलतात तरी कसे?
दुःखभरल्या या जगात लोक सुखावतात तरी कसे?
सत्यापासून दूर लोक स्वप्नात रमतात तरी कसे?
अशाश्वताच्या सत्यास लोक विसरतात तरी कसे?
प्रेमापासून दूर लोक भांडतात तरी कसे?
मायेशिवाय बाल्य इथे फुलतेच तरी कसे?
निराधारांना आधार इथे मिळणार तरी कसे?
स्वतःपुरता विचार सोडायला लोक शिकणार तरी कसे?
वर्तमानात अंधकार लोक जगतात तरी कसे?
भविष्यही नाही साकार, लोक निष्काळजी कसे?
मन माझे निराधार, कळेना आधार लोकांचे कसे?
शोधे शांती निराकार, शक्य करावे हे कसे?
सारेच कसे मी उमजणार तर कसे?
समजून उमजून हि वळते कधी न कसे?
नाही! मला मात्र नाही हे असे जगायचे...
पण...
पण कुणास ठाऊक मलाही जगावे लागणार आहे कसे?
मन माझे
मन माझे वेडे सदा अशांतीतच रमे
खुणावेल जो कोणी त्या मागे पळते
कधी रमते रम्य स्वप्नचीत्रात
राजा आणि राणी नाही कशाची ददात
सुखामागे पळे बापुडे दुःखालाही स्वीकारत
मन माझे वेडे, शोधे अर्थ सगळ्यात
कधी होई कासावीस, वाटे निराधार
सगळेच होई निरर्थक आणि निराकार
सुखाची नसे चिंता होई दुःखावर स्वर
मन माझे वेडे, नाही दुःखही साकार
कधी रमते भविष्याच्या सुखस्वप्नात
ग्रासते कधी वर्तमानाच्या विवंचनात
भांबावते भूतकाळाच्या आठवणीत केव्हा
मन माझे वेडे, न जाणो स्थिरावेल केव्हा
लोक जगतात तरी का आणि कसे
मी तरी जगते कशी आणि का
उत्तरे मिळूनही अनुत्तरीतच हे कोडे
मन माझे वेडे, शोधे कोठे उत्तर का सापडे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा