शनिवार, १२ जून, २०१०

कधी वाटतं - निवेदिता पटवर्धन

कितीतरी मोठ्या मोठ्या कवींच्या किती तरी छान छान कवितांची नोंद अजून बाकी असताना मी माझीच कविता निवडण्याचे कारण म्हणजे हा शुक्रवार-शनिवार इतके कार्यक्रम होते कि फार काही लिहायला वेळच नव्हता. पण आता दर शनिवारी एका कवितेची नोंद करायचीच असे ठरवले असल्यामुळे माझीच कविता निवडली.

माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे चित्रा भावेच्या भावाने म्हणजे डॉ. भूषण केळकरने अनिवासी भारतीयांच्या कवितांचा 'निवडक तीन' असा एक कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्यात माझ्याही तीन कवितांची निवड झाली होती. हि कविता त्यातलीच एक...

कधी वाटतं पाण्यासारखं व्हावं
मिळेल त्या रंगत मिसळून जावं
प्रसंगी बर्फ होऊन खंबीर बनावं
तर कधी वाफेसारखं सर्वांत सामावून जावं!

कधी वाटतं हवेसारखं व्हावं
सर्व व्योमात व्यापून उरावं
मोजमाप सोडून अनमोल व्हावं
अनमोल होऊनही बिनमोलात उपलब्ध व्हावं!

कधी वाटतं आकाशासारखा व्हावं
सर्वांवर प्रेमाचं पांघरूण घालावं
विजेसारखं चमकून धाकात ठेवावं
पाऊस होऊन कधी मायेने बरसावं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा