रविवार, २७ जून, २०१०

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे - ना. धों. महानोर ('रानातल्या कविता' ह्या काव्यसंग्रहातून )

महानोरांचा रानाशी एक गहिरा संबध होता... एक नाते होते... त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर

ह्या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...



त्यांचे रानावर अतोनात प्रेम होते आणि रानाचेही त्यांच्यावर प्रेम होते... ते रानाशीच त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी बोलतात... रानही त्यांच्याशी बोलत असावे कारण त्यांना रानाच्या संवेदना जाणवल्याचे दिसते....

महानोरांनी निसर्गाला एक शक्ती न मानता, त्याला देह दिला आहे; त्याचे अनुभव व संवेदना यांचे दर्शन त्यांना देहाच्या माध्यमातून घडले आहे. हा निसर्ग देहधारी असल्यामुळे तो प्रतिमित होणे हेही अधिक सुकर झाले आहे. महानोनारणी त्याचे केवळ चेतानीकरण न करता, त्याला एक स्वयंपूर्ण अस्तित्वच दिले आहे....

त्यांचे रानाशी झालेले सायुज्य शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही स्वरूपाचे आहे. तोच महानोरांचा संपूर्ण अनुभव आहे. त्यांना या अनुभावापुढे इतर सगळे दुय्यम वाटते. रान हे त्यांचे ध्यान, त्यांचा साक्षात्कार. एकदा हा साक्षात्कार झाला की नभ आणि भुई यांच्यातील भावबंध जाणवू लागतो. डोळे भरून येतात. जीव तेथेच गुंतून राहतो.
विजया राजाध्यक्षांच्या 'ना. धों. महानोर यांची कविता' ह्या लेखामधून....


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोन्धाल्याला चांदणे लखडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेह्श होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा