शुक्रवार, ७ मे, २०१०

तळ्याकाठी - अनिल

धन्यवाद! बऱ्याच लोकांनी email मधून माझ्या कल्पनेला दाद दिली व मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मनापासून आभार... माझ्याबरोबरच बऱ्याच लोकांच्या कवितेच्या छंदाला माझ्या blog मुळे हवा लागणार आहे असे कळल्याने एकदम हुरूपहि आला... थोडी जवाबदारीही वाढल्यासारखी वाटली; पण एकंदरीत खूप बरे वाटले कि मी हा blog लिहायचे मनावर घेतले....
ह्या आठवड्यामध्ये कोणाची व कोणती कविता निवडावी ह्यावर खूप विचार केला.... त्या निमित्ताने कितीतरी कविता मनात आल्या, वाचल्या गेल्या.... शेवटी निवडली अनिलांची 'दशपदी'...
'दशपदी म्हणजे दहा ओळींची कविता.... हि दशपदी लांबीने लहान; यमकांच्या साखळीने ती एकत्र बांधली जात नाही. कारण तशा त्या पाच स्वतंत्र द्विपद्या असतात. तिची एकात्मता अंतर्गत असते. भाववृत्तीचे एकाग्र चित्रण करणाऱ्या या आटोपशीर कवितांत निसर्गाचा तपशील असला तरी तो वृत्तीच्या अंकित असतो, आणि या वृत्तीचा उच्चारही अति-संयमित असतो...' मंगेश राजाध्यक्ष यांनी अनिलांच्या 'सांगाती' या काव्यसंग्रहासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून....
मी वाचलेल्या दशपद्यांपैकी मला भावलेल्या दशपद्या म्हणजे 'एक दिवस', 'एकटेपणा', 'आणीबाणी', ' पावसाळी सांज' व 'तळ्याकाठी'.... एकेक करून मी ह्या सगळ्यांची नोंद यथावकाश करीनच पण आजची कविता 'तळ्याकाठी'...

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वःताच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवित कापरे जलवलये उडवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा ठाव वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपऱ्यांत एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते!


ह्यातली काही काही यमके थोडी खटकतात म्हणजे नीट जुळून आल्यासारखी वाटत नाहीत... पण मला एकंदरीत कविता व कवितेचा विषय आवडला... एक छान शब्दचित्र तयार होते मनासमोर.... शेवटच्या दोन ओळी मला सगळ्यात जास्ती आवडल्या व भावल्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा