शनिवार, २९ मे, २०१०

माझी माय सरसोती - बहिणाबाई चौधरी ( 'बहिणाईची गाणी' ह्या काव्यसंग्रहातून)

निसर्गकन्या बहीणाबाईबद्दल कितीही बोललं आणि लिहील तरी ते कमीच वाटेल. निरक्षर आणि अशिक्षित असूनही त्यांची प्रतिभा, त्यांचे जीवनाविषयीचे तत्वज्ञान, त्यांची भक्ती आणि हे सर्व अतिशय साध्या, सोप्या बोली भाषेत मांडण्यावरचे त्यांचे प्रभुत्व पाहून मन मोहित तर होतेच पण बहीणाबाईबद्दल खूप आदर व आपुलकीही वाटते. बऱ्याच मान्यवरांनी त्यांच्याबद्दल, त्यांच्या कविताबद्दल खूप काही लिहून ठेवले आहे. 'बहीणाईची गाणी' ह्या पुस्तकासाठी आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून....

रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपधिक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता 'माय भिमाई माउली, जशी आंब्याची साउली' किंवा 'माझ्या माहेरची वाट, माले वाटे मखमल' असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते?.... बहीणाईच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी-बियाणे कसे प्रकट होते ह्याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा.

ऊन वाऱ्याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पान
जसे हात जोडीसन
टाया वाजवती पान
दंग देवाच्या भजनी


'तानक्या सोपानाला' हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाई शेताला निघाल्या कि काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लहडलेले हिरवे वडाचे झाड दिसले कि लागले ते त्यांच्या ओठांवर नाचायला:

हिरवी हिरवी पान
लाल फळ जशी चोच
आले वडाच्या झाडाला
जस पीक पोपटाच...


खळ्यात बैलाची पात सुरु झाली आणि मेढ्याभोवती बैल गरा गरा फिरू लागला कि लागलेच ते त्या बैलाला गोंजारायला:

पाय उचल रे बैला
कर बापा आता घाई
चालू दे रे रगडन
तुझ्या पायाची पुण्याई


उपणणीच्या वेळी वारयाने यावयाला जरा उशीर केला कि त्याने मारलीच त्याला हाक:

चाल ये रे ये रे वाऱ्या
ये रे मारोतीच्या बाप्या
नको देऊ रे गुंगारा
पुऱ्या झाल्या तुझ्या थापा!


शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे, पण जीवनाबद्दल कृतज्ञता बाळगून शेतकऱ्याने पंढरीच्या विठ्ठलावर भरीभार ठेवावा असे त्यांचे सांगणे होते.

शेतामधी गये घाम
हाडं मोडीसनी
आता घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी ....


अशा रीतीने महाराष्ट्रातील भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकर्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहीणाईच्या ह्या गाण्यांतून प्रकट झालेले आढळून येईल. मात्र, बहीणाईच्या काव्याचे एवढेच वैशिष्ठ्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान्याची किंवा महाकवींची प्रतिभाच जणू काही त्यांना प्राप्त झालेली होती....
गडकरी आणि कोल्हटकर ह्यांच्यासारख्या प्रगल्भ विनोदपंडितांना शोभेल असला कोटिबाज आणि उपरोधिक विनोद बहीणाईनी आपल्या काव्यात सहज केलेला आहे.

भाऊ 'घमा' गाळी घाम
'गणा' भगतगणात


ही शब्दांची मौज जाता जाता त्या साधू शकतात. तथापि, ज्यातून पीठ 'येते' त्याला 'जाते' का म्हणतात, जो जमिनीत 'ऊभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्या दिवसाला 'पाडवा' का म्हणतात ही बहीणाईची विनोदी पृच्छा मार्मिक नाही असे कोण म्हणेल? विचारांचा आणि वर्णनाचा विनोद करण्यातही त्यांचा चांगलाच हातखंडा होता...

नाव ठेवी अवघ्याले
करी सर्वांची नक्कल
हासवता हासवता
शिकवते रे अक्कल!


माणसाना हसवून शहाणे करावयाचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहीणाईने विनोदाचे हे सामर्थ्य ओळखलेले होते...
रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहीणाईचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामांच्या दृष्टीने फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे.
रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असे माझे मत आहे. 'अशी कशी वेडी ग माये' पेक्षा 'अशी कशी येळी व माये' किंवा 'पाणी लौकीच नितळ | त्याला अमृताची गोडी' ह्यापेक्षा 'पानी लौकीच नित्तय | त्याले अम्रीताची गोडी' ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. एखादे गोजिरवाणे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो, तसे बहिणाईचे काव्य वाचताना मनाला नि कानाला वाटते. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे....


'माझी माय सरसोती ' ह्या त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान मांडले आहे... ते त्यांना कसे व कोण सुचवते हे हि सांगितले आहे... शिवाय त्याचा आणि त्यांच्या भक्तीचा त्यांच्या जीवनाशी कसा संबध आहे हे हि दाखवून दिले आहे....



माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीत पेरली!

माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता- भागवत
पावसात समावत
माटीमधी उगवत!

अरे देवाचं दर्सन
झालं झालं आपसूक
हिरीदात सुर्यबापा
दाये अरूपाच रूप!

तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानामंधी
देवा तुझं येनजान
वारा सांगे कानामंधी!

फुलामधी समावला
धरित्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?

किती रंगवीशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग
रंग खेये आभायात.

धर्ती मधल्या रसान
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा